पैठण, पुढारी वृत्तसेवा : येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९४.५ इतकी झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची सुचना पाठबंधारे विभागाने दिली आहे.
यामुळे नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपअभियंता विजय काकडे यांनी शनिवारी (दि.७) रोजी रात्री दिला. नाथसागर धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे गोदावरी नदीत विसर्ग करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने घेतला आहे.