

Rain lashed the city and surrounding areas on Wednesday, accompanied by strong winds
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरात जोरदार वार्यासह बुधवारी (दि.११) मान्सूनचा पाऊस दमदार बरसला. यावेळी दहा मिनिटांच्या तुफानी वादळाने शहरवासीयांची दाणादाण उडावली. या वार्यामुळे काही भागांतील घरांवरील पत्रे उडून गेली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सोसाट्याच्या वार्याने काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर सिध्दार्थ उद्यानाचा स्लॅब कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. मात्र पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाल्याने अर्धे शहर अंधारात होते.
यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. त्यामुळे मृग नक्षत्राचा दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा होती. मात्र वातावरणातील अनपेक्षित बदलामुळे मान्सूनचा पाऊस लांबला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणात ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. त्यानंतर सायंकाळी शहर व परिसरात अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला.
दहा मिनिटे सुरू असलेल्या वादळीवाऱ्यामुळे काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झाले. या सोसाट्याच्या वाऱ्याचा मोठा फटका सिध्दार्थ उद्यानाला बसला. प्रवेशद्वाराचे स्लॅब कोसळून दोन महिला ठार झाल्या, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच चार जण किरकोळ जखमी झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच काही भागांतील घरांवरील पत्रे उडाली.
या वादळीवाऱ्यामुळे जालाननगर, ज्योतीनगर, जैन नगर, विमानतळ समोर, गारखेडा, गोपाल टी, हसूल या भागातील झाडे उन्मळून पडली. दरम्यान, भगतसिंगनगर येथील मोठे वृक्ष कोसळून त्याची एक फांदी एका १९ वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळली त्यामुळे त्या मुलीच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जवळपास अर्धे शहर अंधारात बुडाले होते. यादरम्यान महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जिल्ह्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर बुधवारी कमाल ३३.२ तर किमान २५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत नोंदवली गेली.
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह विजेच्या कडाकडाटात जोरदार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक राहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांसह पशुधनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
इंडिगोचे विमान वळवले नाशिककडे वादळीवाऱ्यामुळे इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान शहरावर तीन ते चार घिरट्या मारून नाशिककडे वळवावे लागले. हे विमान बुधवारी (दि.११) नियमित वेळेप्रमाणे सायंकाळी ६:१५ वाजेदरम्यान शहराच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. मात्र त्याच वेळी शहरात वादळ सुटले होते. अशा परिस्थितीत या विमानाला लैंडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वैमानिकाने शहराच्या हवाई क्षेत्रात घिरट्या मारून वादळ शांत होण्याची प्रतीक्षा केली. परंतु बराच वेळ वादळ सुरूच राहिल्याने हे विमान नाशिकला वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.