

Provide compensation to mango growers in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील केशर आंबा बागांचे मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी (दि.१३) आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बुधवारी आ. सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी मराठवाड्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिले. तसेच गेल्या काही वर्षांपासून वादळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा पिकांचे सातत्याने नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान कोकणातील आंबा उत्पादकांना शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई दिली. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली. याप्रसंगी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष संजय जाधव व दिलीप बनकर यांची उपस्थिती होती.