

पिशोर: कन्नड तालुक्यातील पिशोर व नाचनवेल परिसरात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून कापूस, सोयाबीन, मका, तूर, आले आदी पिकांची पेरणी पूर्ण झाली. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांनी करपू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून अनेक शेतांतील पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी रोपे सुकू लागली आहेत. विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांतील पाणीसाठाही घटत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते व मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
उशिरा झालेली पेरणी आणि त्यानंतरची पावसाची ओढ यामुळे हंगाम धोक्यात आला असून वेळेत दमदार पाऊस न झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, कोमेजलेल्या पिकांना नवजीवन देण्यासाठी लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
विहिरींनी गाठला तळ
संपूर्ण जून महिना कोरडाच गेला.जुलै महिन्यात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. पिकांना कोंब फुटत असतांनाच पावसाने दडी मारली आहे. सध्या उन्हाळ्यासारखे उन्ह तापत असल्याने कोवळी पीक जळू लागली आहे. ठिबकच्या सहाय्याने पीक जगवावे परंतु विहिरींनीही तळ गाठल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.