

Online app for fertilizer purchase scheme a headache for farmers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या रसायन व खत खत मंत्रालयाने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात खरेदीसाठी ऑनलाईन अॅपद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी या योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी, खत विक्रेते आणि कृषी विभागाची मोठी कोंडी झाली आहे. ऐन खरिपाच्या हंगामात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, कृषी विभागाचे अधिकारीही समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारी आणि प्रत्यक्ष अनुभव सातत्याने राज्य शासन तसेच केंद्र सरकारच्या खत मंत्रालयापर्यंत पोहोचविले जात आहेत. अॅपमधील त्रुटी दूर करण्यासाठी मंत्रालय, राज्य शासन आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय सुरू असला, तरी अडचणी कायम असल्याचे चित्र आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशभरातील खत वापराच्या पद्धतीचा अभ्यास केला होता. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक खत वापर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी वापर कोल्हापूर जिल्ह्यात होत असल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातून या दोन जिल्ह्यांची ऑनलाईन खत खरेदी प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. जमिनीचा पोत आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी खतांच्या वापरावर नियंत्रण व नियोजन साधणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
मात्र, तांत्रिक अडथळ्यांमुळे अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्याची चर्चा आहे. अशा येतात अडचणी अॅप वापरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी वेळेवर मिळत नाही किंवा उशिरा मिळाल्याने टाईम आऊट होतो. गट नंबर व क्षेत्र निवडल्यानंतर मल्टीक्रॉप नोंदणी करता येत नसल्याने आवश्यक खत बुकिंगमध्ये अडथळे येतात. क्यूआर कोड जनरेट झाल्यानंतर बायोमेट्रिक प्रत्यक्ष प्रमाणीकरणासाठी कृषी सेवा केंद्रावर जावे लागते, ज्यामुळे महिला व वृद्ध शेतकऱ्यांना अडचणी येतात.
नोंदणी करूनही खत मिळेना
दरम्यान, १० जूनअखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४० हजार खत बुकिंगची नोंद झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात १३ हजार बुकिंग झाली आहेत. मात्र नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खत मिळण्यात अडचणी येत असल्याने या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर अॅपमधील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी शेतकरी व खत विक्रेत्यांकडून केली जात आहे.