

New Bridge at Apegaon Threatened by Rampant Illegal Sand Transportation
पैठण, पुढारी वृत्तसेवा: ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्म गावातील आ-पेगाव येथील मंदिरामागील बाजूला सन २००२ यावर्षी ४० कोटी खर्च करून ३८० मीटर सिमेंट काँक्रीटचा पूल निर्माण केला होता. हा पूल पडल्यानंतर नवीन पूल उभारण्यात आला. या पुलावरून अवैध पध्दतीने हायवाव्दारे वाळू वाहतूक सुरू आहे. या बाहनांमुळे या नवीन पुलालाही धोका निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्याला जोडणारा गोदावरी नदीच्या जुन्या पुलावरून वाळू तस्करांच्या जडवाहतुकीमुळे सदरील पूल कोसळला होता. या पुलाच्या मार्गावरून संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आषाढी वारी साठी प्रस्थान होत असे. कुरणपिंपरी सह अनेक गावाचा संपर्क यामुळे तुटला होता. यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोठा नबीन पूल निर्माण करण्यात आला.
बोरगाव ( ता. गेवराई) येथील वाळू टेंडरच्या नावाखाली गोदावरी नदीतून अवैधरित्या हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे. या नवीन पुलावरून वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव जातात. पुलावरून दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत आहे. पुलाला त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
सध्या पैठण तालुक्यात पावसाळ्यापूर्वी शेकडो वाळू तस्करांकडून विना क्रमांकाच्या हायवा वाहनाने अवैधरित्या वाळूसाठा करण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यातील वाळू तस्करांनी उडी घेतली घेऊन बोरगाव (ता. गेवराई ) येथील वाळू टेंडरच्या नावाखाली पैठण तालुक्याच्या गोदावरी नदी हद्दीतून जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर यारी मशीनच्या साह्याने वाळूचा बेसुमार उपसा सुरु आहे.
पोलिस, महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विना क्रमांकाच्या हायवा बाहनाने पैठण आपेगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वाळू पोहचविली जात आहे. या वाहतुकीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली झाली.
पाण्याची पाईपलाईन व पिकाची दररोज नासाडी होत आहे. या वाळू वाहतुकीमुळे आपेगाव येथील नवीन निर्माण केलेल्या पुलाला देखील धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर लाकडं टाकून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. तरीही अवैध पध्दतीने होणारी वाळू वाहतूक बंद होत नसल्यामुळे परिसरातील नागरिक शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र
आपेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून वाळू सह जडवाहतूक करण्यात येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर यांनी वरिष्ठ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महसूल विभाग सह पोलिस प्रशासनाला पत्र दिले असल्याचे सांगण्यात येते.