पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे गुरुवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास उघडण्यात आले. ५६ हजार ५९२ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीत होत आहे. धरणाच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उचलण्याचा निर्णय घेतला. ५६ हजार ५९२ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीत होत आहे. यामुळे नदी लगत असलेल्या गावांमध्ये तालुका प्रशासन विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार सारंग चव्हाण, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पंचायत समिती प्रशासनाचे राजेश कांबळे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.