

Nath Palkhi procession welcomed in Ahilyanagar
विठ्ठल माझा जीवाभाव । विठ्ठल पंढरीचा राव ॥ तुका म्हणे धाव । आहे पंढरी विसावा ।
पैठण, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी पादुका सोहळ्याचे बुधवारी (दि. ८) अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश होताच प्रशासन आणि भाविकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नाथांच्या पादुकांचे पूजन करून वारकऱ्यांचे आदरातिथ्य करण्यात आले.
पहिला मुक्काम चनकवाडी (ता. पैठण) येथे झाल्यानंतर बुधवारी सकाळी पालखी सोहळा पाटेगाव येथे दाखल झाला. ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात पालखीचे स्वागत केले.
वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. नाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी सरपंच गोकुळ रावस व उपसरपंच सतीश करपे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा दादेगाव मार्गे मुंगी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथे पोहोचला. येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, गटविकास अधिकारी सोशल शहा, विस्तार अधिकारी सचिन भाकरे, ग्रामपंचायत अधिकारी रमेश राठोड, तलाठी राजेश राठोड, सरपंच ललिता ढमढेरे, उपसरपंच वंदना घाटोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र ढमढेरे, सोसायटीचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्यासह मान्यवरांनी पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी यांचे स्वागत करून नाथांच्या पादुकांचे पूजन केले.
सायंकाळी पालखी सोहळा दुसऱ्या मुक्कामासाठी हादगाव (ता. शेवगाव) येथे दाखल झाला. गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे व लेझीमच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढली. दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सोहळ्याचा तिसरा मुक्काम आज भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंडल पारगाव येथे होणार असून, तेथेही भाविकांकडून पालखीच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.