

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने बसच्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १५ एप्रिल २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत साध्या आणि जलद बससेवावर लागू करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. उन्हाळी सुट्या, सण-उत्सव आणि ग्रामीण भागातून शहरांकडे वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.
वातानुकूलित, शिवशाही, जनशताब्दी आणि इतर प्रीमियम बससेवामध्ये कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच १५ एप्रिलपूर्वी आरक्षित केलेल्या तिकिटांतून फरकाची रक्कम वसूल केली जाणार आहे.
प्रवाशांना अधिक सुरक्षित व नियमित सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. तथापि, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांवर या निर्णयाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.