![मनोज जरांगे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2Fmanoj-jarange-patil-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : आम्हाला आरक्षण मिळण्याच्या वेळीच नेमकी आंदोलन कशी उभी राहतात? यावरून ओबीसींचे सुरू असलेले आंदोलन सरकाराने उभे केले असून हे आंदोलन 'सरकार पुरस्कृत' असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जरांगे म्हणाले, आमच्याप्रमाणे ओबीसींनाही आंदोलन करण्याचा अधिकार असल्याने त्यांना रोखणार नाही व रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचे आंदोलन करावे. आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आहे. मात्र आमच्यावर दादागिरी केली जाते तो भाग वेगळा असला तरी 13 जुलैपर्यंत संयमाची भूमिका कायम ठेवून काही बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.
ओबीसी आरक्षणामुळे हे सरकार कोंडीत सापडले. सरकार आमच्या आमच्यात भांडणे लावून एका बाजूला शांत बसले आहे, असा आरोप जरांगे यांनी केला तर मुळात गावखेड्यांतील ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलायचे तर समाजाच्या बाजूने बोलावे; अन्यथा बोलू नये, असे जरांगे
म्हणाले.
राजकारण हा आमचा अजेंडा नाही; मात्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आमच्यासमोर राजकारणात उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 288 मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे. दोन टप्प्यांत 67 मतदारसंघांचा सर्व्हे केला आहे. राज्यात एकूण 6 टप्प्यांत सर्व्हेचे काम होईल. तसेच निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे, याचा निर्णय समाजाच्या बैठकीत होईल, असे जरांगे म्हणाले.