

Monsoon delayed; sowing likely to be postponed
कन्नड, पुढारी वृत्तसेवा राज्यात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा होऊनही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. "आज येईल, उद्या येईल" या आशेवर बळीराजा दररोज आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
मात्र मान्सूनचा प्रवास रखडल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, यावर्षी खरीप हंगामातील पेरणी उशिरा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील शेतकरी आता "आभाळ भरून यावं आणि पावसाच्या सरींनी शिवार पुन्हा हिरवं व्हावं," अशा भावना व्यक्त करत आहेत. सध्या मात्र बळीराजाच्या नजरा आकाशाकडेच खिळल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आधीच शेती मशागत, नांगरणी, वखरणी आणि बियाणे व खतांची खरेदी करून तयारी पूर्ण केली आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने ही सर्व तयारी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी पहिल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, पेरणीचा मुहूर्त पुढे ढकलावा लागत आहे.
दरम्यान, वाढते तापमान आणि सतत वाहणारे उष्ण वारे यामुळे विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी पिकांना दिले जाणारे पाणी अपुरे पडत असून ऊस, भाजीपाला आणि फळबागा धोक्यात आला आहे.
हवामानातील अनिश्चितता आणि बदलत्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची मानसिकता खचत चालली असून सरकारने आणि कृषी विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.