

MLA Abdul Sattar extends a helping hand to those affected by heavy rains
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी धाव घेत खऱ्याअर्थाने लोकप्रतिनिधी व पालकत्वाचे कर्तव्ये बजावले. आपत्तीग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी बाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य व शासकीय मदतीचे धनादेश वाटप केले.
ढगफुटीसदृश पावसाने अनेकांचे संसार वाहून गेले, घरातील वस्तू, कपडे, भांडी, किराणा सगळे पाण्यात वाहून गेले. अशा बिकट परिस्थितीत आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने मदतीचा हात पुढे करत त्यांनी भांडी, किराणा किट, कपडे, ब्लॅकेट यांसारख्या वस्तूंचे वाटप केले. तसेच घराचे नुकसान झालेल्या ७ बाधित कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश त्यांच्या हस्ते देण्यात आले.
अमठाणा व परिसरात आठवडाभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे कामही आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. संकटाच्या काळात लोकांसोबत उभे राहून त्यांनी मकर्तव्य बजावणारा लोकप्रतिनिधी म म्हणून आपली ओळख अधिक दृढ केली. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अतिवृष्टीतील बाधितांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
नवरात्र-दसरा सणाच्या काळात कुटुंबांना आधार मिळावा यासाठी ही मदत देण्यात आली आहे. असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. या कार्यक्रमास तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, चेअरमन अर्जुन गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, सतीश ताठे, किशोर अग्रवाल, विठ्ठल सपकाळ, लक्ष्मण तायडे, सरपंच श्रीराम कुंटे, उपसरपंच हरीश देशमुख, गणेश गरुड, बाबासाहेब देशमुख, सय्यद सिकंदर आदींची यावेळी उपस्थिती होती.
अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार अब्दुल सत्तार स्वतः धावून गेले. शासनाची मदत येण्याआधीच वैयक्तिक पुढाकार घेऊन त्यांनी जीवनावश्यक साहित्य व धनादेश वाटप करत लोकांच्या दुः खात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे कर्तव्य बजावले. "संकटाच्या वेळी लोकांना सोडणार नाही" हा आपला निर्धार कृतीत उतरवत सत्तार यांनी बाधितांच्या डोळ्यात दिलासा आणि हृदयात विश्वास निर्माण केला.