

AIMIM will also enter the ZP election fray
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
निवडणुकीत एमआयएम पक्षानेही निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेला आज सोमवारपासून सुरुवात होणार असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर छाननी करून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती एमआयएम उमेदवार निवड समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर एमआयएमने आता ग्रामीण भागात ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे ८३ नगर सेवक निवडून आले असून, त्यानंतर विविध महापालिकांमध्ये तब्बल १२५ नगरसेवक विजयी झाले आहेत. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह काही प्रस्थापित पक्षांपेक्षा एमआयएमला अधिक यश मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एमआयएम प्रदे शाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उमेदवार निवड समितीचे सदस्य नासेर सिद्दीकी, शेख अहमद, शारेख नक्षबंदी आणि विकास एडके यांची उपस्थिती होती.
यावेळी नासेर सिद्दीकी यांनी सांगितले की, जिल्हा परिषद
निवडणुकीसाठी चार सदस्यांची उमेदवार निवड समिती स्थापन करण्यात आली असून, काम करणाऱ्या योग्य उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यावेळी विकास एडके यांनी एमआयएमने महापालिका निवडणुकांत विविध समाजांतील उमेदवारांना संधी देत धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवून दिल्याचे सांगितले, तर शेख अहमद यांनी ग्रामपंचायत निवडणुकांत पॅनल पद्धतीने उतरवलेल्या उमेदवारांना अनेक ठिकाणी यश मिळाल्याचा दाखला देत जिल्हा परिषदेतही चांगला निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
विकासकामे करणाऱ्या इच्छुकांना प्राधान्य
छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, धाराशिवसह एकूण १२ जिल्ह्यांत उमेदवार देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची माहिती शारेख नक्षबंदी यांनी दिली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात आज सोमवारपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची छाननी करून उमेदवारांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात येईल. ग्रामीण भागात सामाजिक व विकासात्मक काम करणाऱ्या इच्छुकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे शारेख नक्षबंदी यांनी स्पष्ट केले.