

खुलातबाद : पवित्र महाशिवरात्री उत्सवानिमित्त वेरूळ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी मंदिर परिसर, रस्ते, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच प्रमुख मार्गाची साफसफाई करण्यात आली. ग्रामपंचायत, नगरपरिषद कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. महाशिवरात्री हा धार्मिक उत्सव असला तरी स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
भाविकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात आली असून, कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.
या अभियानात तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, खुलताबादचे मुख्याधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे, सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
उपअभियंता वीरवडेकर, शाखा अभियंता तांगडे प्रथम लिपिक प्रदीप चव्हाण, अंकुश जाधव विजय जंगाळे, गणेश इंगळे, शेगमवार महेश वाकळे, नारायण जाधव, आशा पाटेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा परिषद सदस्य विकास कापसे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक परसराम बारगळ यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, प्रतिनिधी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज
महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे येणाऱ्या हजारो भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, महास्वच्छता अभियानामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदीर प्रशासनाने सज्य झाले आहे.