

खुलताबाद : तालुक्यातील मावसाळा गावात गेल्या सात ते आठ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील पाणी पुरवठा योजनेची मोटार मागील आठ दिवसांपासून बंद असून तिची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्याच्या शोधात महिलांना घरातील कामे व मजुरीची कामे बाजूला ठेवावी लागत आहेत. अनेक कुटुंबांना शेजारच्या वस्त्या किंवा खासगी विहिरींमधून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहेत. विद्यार्थ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवल्या जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच पाणीटंचाईबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नियमित कर भरूनही संघर्ष कायम
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते नियमितपणे नळपट्टी व घरपट्टी भरत असतानाही त्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बंद पडलेली मोटार दुरुस्त करावी व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून तातडीच्या कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.