

Massive overcrowding of passengers on the Tapovan Express running on the Nanded-Mumbai route
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नांदेड ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेससह सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
तपोवन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित आणि इतर डब्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने अनेकांना जनरल डब्यातून उभे राहून प्रवास करावा लागत आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रेल्वे संघटनांनी केला असून, सोयीसुविधांसाठी छत्रपती संभाजीनगरचा भाग मध्य रेल्वेत विलीन करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानक परिसरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.