![मनोज जरांगे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2Fmanoj-jarange-patil-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चार जूनच्या उपोषणाची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली आहे, या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज (सोमवार) सकाळी (दि.२०) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा. मात्र तुम्हाला मराठा समाजाची एकजूट, ताकद चार जूनच्या उपोषणातून दिसून येईल. असा गर्भित इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच्या मागणीसाठीच हा लढा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
तुमच्यावर जातीयवादाचे आरोप करण्यात येत आहेत यावर जरांगे म्हणाले, मी कुठलाही जातिवाद केलेला नाही व गाव खेड्यात मराठा ओबीसी समाजात कुठलाही जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले नाही, करणार नाही. असे असताना ओबीसी नेते मला जातीयवादी म्हणत आहेत. असा टोला नाव न घेता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना लगावला. निवडणूक मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो आणि मतदान झाल्यानंतर मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी ओबीसी नेत्यांवर केला.
जरांगे म्हणाले, प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारले असता, काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत असून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र मी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. तेव्हा ते बोलले, मनुष्यबळ निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रमाणपत्राला थोडा विलंब होत असून आचारसंहितेनंतर २० तारखेपासून प्रक्रिया गतीने सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही तो माझा मार्ग नाही. मात्र मागण्या मान्य केल्या नाहीत तर समाजाला येत्या विधानसभा निवडणुकीत उतरवणार असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. यामुळे जरांगे परळी व गेवराईतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
हेही वाचा :