

छत्रपती संभाजीनगर : मागील वर्षभरापासून राज्य हे सरकार सरकारकडे ५८ लाख कुणबी नोंदींचा दस्तावेज मागत आहे. मात्र, सरकार या नोंदी कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. तसे झाल्यास पाडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. शहरातील गॅलेक्सी रुग्णालयातून सोमवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीकडे रखाना होताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. हे आंदोलन शांततेत, मात्र देशात यापूर्वी कधीही झाले नसेल एवढ्या ताकदीने करायचे आहे. ही आरक्षणाच्या लढ्याची अंतिम लढाई असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाने अंतरवाली सराटीत जमावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी, या आंदोलनाच्या तयारीसाठी २० ऑगस्टपासून आपण मराठवाडा तसेच विदर्भाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध समाजांत सरकारविरोधात नाराजी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक अडविली जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. तसेच, दलित, मुस्लिम, धनगर आणि मायक्रो ओबीसी समाजातही सरकारविरोधात तीव्र नाराजी असून, २९ ऑगस्टला या नाराजीचा उद्रेक दिसेल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, पेण येथील छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प तातडीने हटवावे, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.