

छत्रपती संभाजीनगर : राज्यात महायुती सरकारचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. आता फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. दोघांमध्ये अतिशय चांगले बॉन्डिंग असून, कोण कुणाला धक्का देतोय, कुरघोडी करतोय याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इथे खंडन केले.
शेंद्रा एमआयडीसी येथील कौशल्य विकास केंद्राचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ते शहरात आले होते. तत्पूर्वी विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारचा १४ तलाव संरक्षण प्रकल्पांचा निर्णय रद्द केल्याचे बोलले जात आहे.
ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या ११ प्रकल्पांचा समावेश होता. याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, नव्याने सरकारमध्ये येऊन आम्हाला एक वर्ष सात महिने झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील बॉण्डिग अत्यंत चांगले आहे. तरीही काही तांत्रिक अडचणी हा निर्णय झाला असावा. मात्र कुणी कुणावर कुरघोडी करतेय, असा कुठलाही मुद्दा नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्या बैठीकीसाठी उद्योगमंत्री शहरात आले होते, ती बैठक काही कारणवास्तव रद्द करण्यात आली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये
मराठवाड्यात मागील तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत म्हणाले, विरोधकांना जी टीका करायची ती करू द्या, त्यांच्या कालावधीत काय झाले हेही मला माहिती आहे, मात्र त्याचे राजकीय भांडवल करायचे नाही. आत्महत्यांचे प्रमाण थांबले पाहिजे किंवा त्या होऊच नये हीच सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.