

Mahavitaran Chikalthana Railway Station Death uncle and nephew electric shock
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप काका-पुतण्या दोघांना आपला जीव गमवावा लागला. १० दिवसांपूर्वी वादळात चिकलठाणा रेल्वेस्टेशनजवळ हायटेंशनचे खांब वाकून तारा जमिनीपर्यंत लोंबकळल्या होत्या. परिसरातील नागरिकांनी महावितरणला याची कल्पनाही दिली होती, परंतु महावितरणने काहीच कारवाई केली नाही. अखेर सोमवारी (दि. १६) सायंकाळी त्या तारेजवळ आपल्या शेतात काम करणाऱ्या भावकीतील दोघांना जोरदार शॉक लागला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कचरू जनार्धन दहिहंडे आणि किरण जगनाथ दहिहंडे (दो-घेही रा. चिकलठाणा) अशी मयतांची नावे आहेत. शेतात मशागत करण्यासाठी कचरू आणि किरण दहिहंडे सोमवारी गेले होते. चिकलठाणा रेल्वेस्टेशनजवळच त्यांची शेती आहे. दहा दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यामुळे शेतातून गेलेल्या हायटेंशनचे पोल वादळात वाकले. पोलवरील तारा जमिनीपर्यंत लोंबकळल्या होत्या. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणला अनेकवेळा माहिती दिली. मात्र दुरुस्ती केली नाही.
शिवाय चालू असलेला वीज पुरवठा खंडित करण्याची तसदीही महावितरणने घेतली नाही. महावितरणचे कोणीही याकडे फिरकले नाही. दरम्यान, सायंकाळी दहिहंडे शेतात काम करत असताना दोघांना विजेची तार दिसली नाही. अचानक तारेचा स्पर्श होऊन दोघांना जोराचा शॉक बसला. तारेला चिकटून दोघेही मृत झाले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी शेतात धाव घेतली. चिकलठाणा गावातील नागरिकही धावले. एमआयडीसी सिडको पोलिसही पोहोचले. सुमारे दोन तास मृतदेह शेतातच होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह घाटीकडे रवाना केले. मात्र संतप्त नातेवाइकांनी मृतदेह चिकलठाणा गावात आणले. जालना रोडवर गावकऱ्यांनी ठिय्या मांडून आक्रोश केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
जमाव संतप्त होत असल्याने बरिष्ठ पोलिस अधिकारीही चिकलठाण्यात दाखल झाले होते. डीसीपी प्रशांत स्वामी हे रात्री साडेदहाच्या सुमारास फौजफाट्यासह पोहोचले. तहसीलदार डॉ. परेश चौधरी आणि महसूलचे अधिकारीही आले. मात्र गावकरी तरीही रस्त्यावर ठिय्या देऊन होते. दरम्यान, दोषीवर कठोर कारवाई करू असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेत रस्ता रात्री साडेअकरानंतर मोकळा केला.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दहिहंडे कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांसह चिकलठाणा येथील शेकडो गावकऱ्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास जालना रोड रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजूंनी सुमारे पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संतप्त गावकऱ्यांची एसीपी सुदर्शन पाटील, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. मात्र त्यामुळे गावकरी आणखीच आक्रमक झाले. आमदार नारायण कुचे हेही चिकलठाण्यात आले. त्यांनी गावकर्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वृत्त देईपर्यंत रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी रस्ता अडवून ठेवलेला होता.
महावितरणच्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी येथे येणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. घटना घडली तरी तिथे महावितरणचे कोणीही आले नाही. डीपी आम्ही बंद करून दहिहंडे यांना बाजूला काढले, अशी संतप्त भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली, एसीपी पाटील आणि पोलिस निरीक्षक कल्याणकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करू. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळेल, असे सांगत होते. मात्र गावकरी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.