

Mafia rampage in the Shekhapur, Dharampur, and Sharanapur areas; blasting used for ground excavation at the foothills of Bhangshi Gad
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : शेखापूर, शरणापूर शिवारातील गट क्रमांक १९ व धरणपूर येथील गट क्रमांक १ व २ मधील शासकीय गायरान जमिनीवर मुरूम माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. भांगशी माता गडाच्या पाठीमागील बाजूस पायथ्याशी तब्बल १० एकर पेक्षा अधिक भागात १५ ते २० फुटांपर्यंत खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात मुरूमाचा उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या माफियांनी चक्क भांगसी गडाच्या पायथ्यालाच सुरूंग लावल्याने गडाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याने त्यांच्या कारभाराविषयीच नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे.
वाळूज महानगरातील तिसगाव खवड्या डोंगर चोहोबाजूंनी पोखरून माफियांनी लाखो रुपयांचा मुरूम गायब केला. आता भांगशी माता गडाच्या डोंगराला माफियांनी विळखा घातला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गडाच्या पाठीमागील बाजूस शेखापूर, धरमपूर, शरणापूर शिवारात शासकीय गायरान जमीन पोखरून मुरूमाची दिवस-रात्र वाहतूक केली जात आहे.
मुरूमाच्या अवैध उत्खननामुळे या परिसराचा नैसर्गिक भूभागच बदलून गेला असून, गडाच्या पायथ्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या काही महिन्यांत या भागातून कोट्यवधी रुपयांचा मुरूम चोरीला गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडालाच अवैध उत्खननाचा विळखा पडत असल्याने भाविकांसह पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे.
प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने माफियांकडून पुन्हा या ठिकाणी उत्खनन सुरू होण्याची भीती नागरिकांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील शंकर बडोगे, गजानन मोरे, दिनेश लोखंडे, संदीप मोरे, भागिनाथ मोरे, कृष्ण आहेर, नामदेव कान्हारे, कल्याण कान्हेरे, महालिंग सदावर्ते, भागिनाथ कचरु मोरे, गजानन मोरे, संदीप मोरे आदींनी केली आहे.
मुरूम उपसा थांबविण्याची मागणी
या भागातील काही सुज्ञ तरुण व नागरिकानी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन माफियांकडून शासकीय जमिनीतून राजरोपणे सुरू असलेला मुरूमाचे उत्खनन थांबविण्यात यावे. तसेच जमिनीचे सर्वेक्षण करून आतापर्यंत किती क्षेत्रात व किती प्रमाणात मुरूम उपसा झाला, याची महसूल विभागाने तातडीने मोजणी करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करून शासनाचा महसूल वसूल करावा, उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री व वाहने जप्त करावीत, अशी मागणी केली आहे.
रस्त्याची लागली वाट
हायवासह टिप्पर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवस-रात्र मुरूमाची वाहतूक केली जाते. या जड वाहतुकीमुळे या भागातील रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर दोन-तीन वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्याची काही महिन्यांतच दुरवस्था झाली आहे. खड्डे, उखडलेला रस्ता आणि धुळीमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मारामारीनंतर पंचनामा
काही दिवसांपूर्वी मुरूम उपशावरून माफियांच्या दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या घटनेनंतर महसूल विभाग व स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.