

Low water storage in other dams in Marathwada except Jayakwadi
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात यंदा ऐन पावसाळ्यात पावसाची अवकृपा झाली आहे. विभागात आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे. परिणामी, जायकवाडी वगळता उर्वरित धरणांमध्येही ठणठणाट आहे. नाशिकातील मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण तेवढे ७७ टक्के भरले आहे. मात्र, मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा ३० टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये अवधा २३ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यात अनपेक्षितपणे दमदार पाऊस झाला. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील शेतकरी सुखावला होता. परंतु नंतर पावसाळयात अपेक्षित पाऊस होत नसल्याचे चित्र आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत विभागात सरासरी २४८ मि. मी. पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ६८ टक्के म्हणजे १६८ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ ४६ टक्केच पाऊस झाला आहे.
अत्यल्प पावसामुळे सिचन प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. मराठवाड्यात ८१ मध्यम प्रकल्प आहेत. त्यात केवळ ३० टक्के इतकाच पाणीसाठा आहे. विभागातील लघु प्रकल्पांची स्थिती त्याहून चिंताजनक आहे. विभागात ७९५ लघु प्रकल्प आहेत. त्यात सध्या केवळ २३. ३४ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात एकूण ४४ मोठे प्रकल्प आहेत. त्यात सरासरी ५९ टक्के इतका जलसाठा दिसत असला तरी त्यात सर्वाधिक वाटा एकट्या जायकवाडी प्रकल्पाचा आहे. यंदा नाशिक परिसरात सतत मुसळधार पाऊस होत असल्याने तेथून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊन जायकवाडी धरण आतापर्यंत ७७टक्के भरले आहे.
जायकवाडी वगळता मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात १०, ७० टक्के, मांजरा धरणात २४ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात २७ टके, येलदरी धरणात ५४ टक्के, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात २२ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणात ६८ टक्के, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात ४३ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.