

Lack of a building for autopsy leads to neglect of bodies
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील बालानगर, पिंपळवाडी येथे आरोग्य केंद्र आहे, परंतु शवविच्छेदन करण्यासाठी इमारत उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील मृत व्यक्तींची अवहेलना सुरूच असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.
याकडे स्थानिक नेत्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बालानगर येथील अहमद जाफर पठाण (६५) यांचा मृतदेह बालानगर ते कापूसवाडी रस्त्यावर आढळून आला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांना मिळाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सपोनि ईश्वर जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक कविता जगताप, जमादार करतारसिंग सिंगल, पोकॉ राहुल मोहतमल, कृष्णा उगले, संदीप कोलते, रामेश्वर पंडित यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून नातेवाइकांच्या मदतीने प्रथम बालानगर येथील आरोग्य केंद्रात मृत व्यक्तीचा मृतदेह आणला, परंतु या आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्र इमारतीची व्यवस्था नसल्याने सदरील मृतदेह पिंपळवाडी पि. आरोग्य केंद्रात खासगी वाहनाने नेला.
या ठिकाणीही शवविच्छेदन करण्यासाठी इमारत नसल्यामुळे मृतदेह थेट येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईक व पोलिस घेऊन आले होते. यावेळी पैठण येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय गुळवे यांनी मृत व्यक्तीच्या अंगावर जखमा असल्यामुळे सदरील मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करावे, असे सांगितल्याने शेवटी मृतदेह या शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीच्या प्रकारामुळे अवहेलना होत असल्याने या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खासगी वाहनाने नेण्याची वेळ नातेवाइकांवर आल्याने हा प्रकार थांबणार तर कधी, अशी संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बालानगर येथील अहमद जाफर पठाण या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या पोलिस पथकाला मिळून आल्या व अंगावर दगडाच्या जखमा आल्या. सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कविता जगताप पुढील तपास करीत आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पैठण तालुक्यातील बालानगर, पिंपळवाडी पि. अधिक प्रमाणावर लोकवस्ती असलेले ठिकाणी आहे. या ठिकाणी आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्रात शवविच्छेदन इमारतसह विविध सुविधांचा अभाव आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. ते हारतुरे घेण्यामध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.