

कडेठाण : पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात एकेकाळी मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी ज्वारी आता कमी होत चालली असून, तिच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जालना आणि अंबडच्या मार्केटमध्ये कडेठाणची ज्वारी म्हटले की ग््रााहकांची झुंबड पडत असे.
सध्या ज्वारीचे दर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. गहू 20-22 .रुपये किलो रुपयांत उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांचा कल गव्हाकडे वळत आहे. पूर्वी दगडी, गोटी, मालदांडी यासारख्या ज्वारीच्या जाती येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत होते. त्या जाती खाण्यास चवदार होत्या, मात्र गेल्या काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने ज्वारीचे उत्पादन घटले आहे. परिणामी मागणी वाढून ज्वारी महागली आहे.
दूध मोगरा ही जात नवीन आहे ती पांढरी शुभ असते व दिसायला चमकदार आहे. तर मालदांडी, गोटी, दगडी या ज्वारी जातीच्या भाकरी चवदार व पौष्टिक आहेत, असे ज्येष्ठ ग््राामस्थांचे म्हणणे आहे.
सरकारकडून रेशनवर स्वस्त दरात गहू उपलब्ध होत असल्याने नागरिक ज्वारीऐवजी गहू वापरण्याकडे वळले आहेत. त्यामुळे ग््राामीण भागातील पारंपरिक भाकरीची जागा हळूहळू चपाती घेताना दिसत आहे.ज्वारीची भाकरी पचायला हलकी व पौष्टिक मानली जाते. मात्र वाढत्या किमतीमुळे रोजच्या वापरात सर्वसामान्यांकडून मर्यादा येत आहेत.
ज्वारीची भाकरी अत्यंत पौष्टिक असून, त्यामध्ये फायबर, लोह आणि आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचन सुधारते व शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. चपातीच्या तुलनेत भाकरी पचायला हलकी असून, मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. संतुलित आहारासाठी ज्वारीसारख्या धान्याचा समावेश आवश्यक आहे.
डॉ. अक्षय खरग
ज्वारीच्या वाढत्या किमतीमुळे विक्री कमी होत असून, गव्हाचा वापर वाढला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ज्वारी उत्पादन वाढवण्याची गरज आहे.
गणेश तानडे, व्यापारी, कडेठाण