

पैठण : पैठण तालुक्यातील दहा महसूल मंडळात यंदा चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे व जायकवाडी धरणाच्या वरील भागातून येणाऱ्या आवकमुळे धरणात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गुरुवार ते शुक्रवारी दुपारपर्यंत पैठण तालुक्यातील विहामांडवा २९, लोहगाव ४४, पाचोड ५५, आडुळ ५८, नांदर ३९, बालानगर ५७, ढोरकीन ४८, बिडकीन ५७, पिंपळवाडी पिं ६०, पैठण ८० मिलिमीटर पाऊस झाला. आजपर्यंत २२५० मिलिमीटर एकूण पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागात करण्यात आली. या पावसामुळे वीटभट्टीवरील व शेती काम करणारे मजुरांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ निर्माण झाली होती.
दरम्यान, गाव परिसरातील छोटे मोठे तलाव, नाले, नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
आमदार विलास भुमरेंकडून पाहणी
आमदार विलासबापू भुमरे यांनी धरण परिसरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता गणेश हसे, अभियंता श्रद्धा निंबाळकर, मंगेश शेलार यांनी हंगामी काळात पाण्याची नियोजन संदर्भात माहिती दिली.
शुक्रवारी (दि.३१) रात्री आठ वाजेपर्यंत वरील धरणातून जायकवाडी धरणात १४ हजार १७७ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाण्याची ७४.७९ टक्केवारी नोंद धरण नियंत्रण कक्षात करण्यात आली. जायकवाडी धरणातून डावा उजवा दोन्ही कालव्यातून शेतीसिंचनासह माजलगाव येथील धरणासाठी ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता गणेश हसे, अभियंता मंगेश शेलार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले आहे.