

Marathwada Jayakwadi Dam Water Storage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिक परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीचे पात्र पुन्हा दुधडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाण्याची आवकही वाढली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रविवारी रात्री जायकवाडीच्या दिशेने तब्बल ३९ हजार १७२ क्युसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू होता. तर दुसरीकडे जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
यंदा जून महिन्यात मराठवाड्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील धरणे रिकामीच आहेत. दुसरीकडे उर्ध्व गोदावरी खोर्यात नाशिक जिल्ह्यात सतत दमदार पाऊस होतो आहे. त्याचा फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढण्यास होत आहे. २० जून रोजी जायकवाडी धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता.
परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी नदीचे पात्र भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. २० जूनपासून ६ जुलैपर्यंत जायकवाडी धरणात तब्बल २१ टक्के पाणी दाखल झाले आहे. त्यातच रविवारी पाण्याची आवक आणखीनच वाढली आहे. शनिवारी सायंकाळी धरणातील उपयुक्त साठा ४९ टक्क्यांवर पोहोचला होता.
नागमठाण येथून जायकवाडी धरणाच्या दिशेने १५ हजार ३८९ क्युसेक पाणी येत होते. रविवारी हा साठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला. तर दुसरीकडे नांदूर मधमेश्वर बंधार्यातून ३९ हजार १७२ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. त्यामुळे पुढील चोवीस तासांत जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यात आणखी वाढ होणार आहे. सध्या उर्ध्व गोदावरी खोर्यातील दारणा, गंगापूर, कडवा, नांदूर मधमेश्वर बंधारा, देवगड आणि नागमठाणा या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.