

In Sambhaji Nagar district, 12 applications were withdrawn in 9 talukas on the very first day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रिया सुरू झाली असून अपक्ष व बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून साम, दाम, दंड आणि भेद या राजकीय डावपेचांचा वापर होत असल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे.
अनेक उमेदवारांची प्रलोभने देऊन मनधरणी केली जात असताना काही तालुक्यांत धमक्यांच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. त्यातच अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.२३) नऊ तालुक्यांत एकूण १२ उमेदवारांनी माघार घेतली.
काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी जाणूनबुजून अपक्ष अर्ज भरायला लावून मतांचे विभाजन करण्याची खेळी केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे माघारीच्या मुदतीत राजकीय हालचालींना वेग आला असून नेतेमंडळी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधत आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी गटातून शिवसेनेचे पुनमचंद चव्हाण यांनी अर्ज मागे घेतला.
सिल्लोड तालुक्यात आमठाणा येथील अविनाश आहेर, घाटनांद्रा येथील प्रेरणा गाढे, चंपाबाई विळवाल, महेक शेख तसेच अजिंठा येथील सारा मोहम्मदी यांनी माघार घेतली. वैजापूर तालुक्यात वांजरगाव गटातून प्रभाकर बारसे यांनी अर्ज मागे घेतला आहे. पैठण तालुक्यातील आडुळ बु आणि नवगाव गटांसह आडुळ बु व पिंपळवाडी पी या गणांतून राजेंद्र औटे, शोभा बोहरा, स्वाती गलांडे व शोभा बोहरा या चार अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली.
कन्नड तालुक्यातून एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. दरम्यान, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर आणि सोयगाव तालुक्यांत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. आज शनिवारीही माघारीची संधी उपलब्ध असून अंतिम दिवसापूर्वी आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे माघारीनंतरच खरी लढत स्पष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.