

In case of inconvenience to the patients, action will be taken against the respective hospitals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू रुग्णांना तातडीने मिळावा, यासाठी रुग्णालयांनी कोणताही विलंब करू नये. कागदपत्रांच्या कारणावरून रुग्णालयांनी रुग्णांना वेठीस धरू नये, त्यांना उपचार नाकारू नयेत.
रुग्णांची गैरसोय झाल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, जिल्ह्यातील ८१ रुग्णालये या योजनांशी संलग्न आहेत. नागरिकांनी या योजनांचा लाभघेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी. यासाठी सेतू सुविधा केंद्रे, आशा स्वयंसेविका, स्वस्त धान्य दुकानदार व अंगणवाडी सेविकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रवी भोपळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून मदत देण्याचे आदेश त्यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिले. गावोगावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तयार करा. कुचराई झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, पुरामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले..