

छत्रपती संभाजीनगर : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागांकडून पाच पेक्षाही जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आली. असून, आता शेवटची संधी ३० जून-२०२६ पर्यंत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सुमारे २ लाख ९४ हजार ११० वाहनधारकांना नंबर प्लेट बसवून घ्याव्या लागणार आहेत. अन्यथा १ जुलैपासून आरटीओच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ३० जून-२०२६ ही शेवटची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची अंदाजे ७लाख वाहने आहेत.
आतापर्यंत या मोहिमेला पाच पेक्षाही जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, ३० जून ही अंतिम मुदत असेल. मुदत संपल्यानंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मात्र ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना कारवाईतून सूट मिळणार आहे.
दरम्यान आरटीओने नागरिकांना आवाहन केले आहे की, मुदत संपण्यापूर्वी तातडीने नोंदणी करून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी. यामुळे दंडात्मक कारवाई व अतिरिक्त खर्च टाळता येईल. वाहनधारकांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळून वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आरटीओतर्फे सांगण्यात आले.