

Heavy rains in 49 mandals in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
गणरायासोबतच मराठवाड्यात पावसाचेही जोरदार आगमन झाले. बुधवारपासून गुरुवारी सकाळपर्यंत पावसाने मराठवाडाभर सलामी दिली. त्यातही नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. लातूर जिल्ह्यातील ३० आणि नांदेड जिल्ह्यातील १७महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे लाखो हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेकडो घरांची पडझड झाली. सुमारे पाचशेहून अधिक जनावरांचाही बळी गेला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गणरायाच्या आगमनासोबतच बुधवारी पावसाचे पुनरागमन झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातनप्राप्त आकडेवारीनुसार, बुधवारी विभागात नांदेड आणि लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.
नांदेडमध्ये सरासरी ४३.४ मिमी तर लातुरात सरासरी ६२.७ मिमी पावसाची झाली. यात नांदेडमधील १७ तर लातुरातील २९ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सोबतच जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एका सर्कलमध्येही अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. एकूण ४८ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
मराठवाड्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे विभागातील धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच तारखेला हा पाणीसाठा केवळ ५३ टक्के इतका होता. विभागातील ११ मोठ्या धरणांपैकी दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत.
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ५१५६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत ४८०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ९३.२० टक्के एवढे आहे. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत या धरणांमध्ये २७५४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५३.४२ टक्के पाणीसाठा होता. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने या धरणातील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे.