

Heavy rainfall in Marathwada
छत्रपती संभाजीनगर वृत्तसेवा : दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या मराठवाड्यात बुधवार (दि.२९) पाठोपाठ गुरुवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवदान आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसाने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे. अन्य प्रकल्पांना मात्र अद्यापही पाण्याची प्रतीक्षा आहे.
यंदा जुन महिना कोरडा गेल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत होते. अपुऱ्या पावसावरही मराठवाड्यात सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र महिनाभर पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग दाटले होते. मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. अशा परिस्थितीत मागील आठवडाभरापासून विभागात सतत पावसाची रिपरिप सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरूवारी दुपारपर्यंत मराठवाड्यातील बहुतांश भागात सलग पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान, अद्यापही मोठ्या पावसाअभावी विभागातील सर्वच प्रकल्पांमध्ये ५० ते ४० टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध आहे. परंतु नगर, नाशिकमध्ये दमदार पाऊस बरसला. त्यामुळे जायकवाडी धरणाची चिंता मिटली असून, वरच्या धरणांतून जायकवाडीत मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यातच जायकवाडी धरणाची पाणी पातळी ३१ टक्क्यांहून ७२ टक्क्यांपार गेली आहे.
प्रकल्पनिहाय जलसाठा
जायकवाडी - ७२ टक्के
निम्न दुधना २२.४९ टक्के
येलदरी - ५२.९७ टक्के
माजलगाव - १६.२८ टक्के
मांजरा - १५.२६ टक्के
पैनगंगा - ४७.९५ टक्के
मानार - ४३.३३ टक्के
निम्न तेरणा २७.६० टक्के
विष्णुपूरी - ३३.९४ टक्के