

Haribhau Bagade: Electricity workers should not fear privatization
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वीज कामगारांनी कंपन्यांच्या खासगीकरणाची भीती बाळगू नये. खासगीकरण होणार नाही आणि कामगारांच्या नोकरीसही धोका नाही. मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यामुळे कामागारांनी खासगीकरणाची चिंता करू नये, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. ते वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या राज्यव्यापी परिषद व केंद्रीय सभेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
वीज तांत्रिक संघटनेच्या वतीने आयसीएआय सभागृह, बीड बायपास येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन यांनी वीज कामगारांचे पेन्शनसह इतर प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले. मुख्य अतिथी अतुल सावेंनी संघटनेच्या मागण्या रास्त असून, यावर मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, अपर मुख्य सचिव, तिन्ही कंपन्यांचे अध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर संघटनचे एन. के. मगर, आर. पी. थोरात, श्रावण कोळनूरकर, ताराचंद कोल्हेमामा, भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन, नाना चट्टे, शिरीष इंगोले, अजिज पठाण, मजहर पठाण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्रावण कोळनूरकर आणि रमेश शिंदे यांनी केले. भाऊसाहेब भाकरे यांनी आभार मानले. यावेळी सय्यद जहिरोद्दीन यांनी विविध ठराव मांडले. पेन्शन योजना स्वबळावर राबवावी. मागील वर्षीचा सानुग्रह अनुदान द्यावे. स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी. खासगीरणाचा घेतलेला निर्णय रद्द करावा यासह इतर ठराव सर्वानुमते पास करण्यात आले.