Hand over Mahavihar to Buddhists on the basis of faith: Bhimrao Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रामजन्मभूमी श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत ती हिंदूंच्या हवाली करण्यात आली. याच निकषाप्रमाणे जगभरातील बौद्धांच्या श्रद्धेचे स्थान असलेले बोधगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी (दि.१९) केले.
भिक्खू करुणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा रविवारी मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी आंदोलन सुरू आहे. यात सर्वांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
यावेळी भिक्खू शरणानंद महाथेरो, भिक्खू प्राचार्य डॉ. खेमधम्मो, बोधी पालो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, विनय रक्खित महाथेरो, भिक्खू सुमनवन्नो महाथेरो, भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भिक्खू एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह या धम्मसोहळ्याचे निमंत्रक प्रा. प्रदीप रोडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्ट सिटीचे रवींद्र जोगदंड, जि.प.चे अशोक सिरसे, गायक पावा, साबांविचे अधीक्षक अभियंता एस.एस. भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी पल्लवी बनसोडे, विनिता सातदिवे यांच्यासह इतर उपासकांनी परिश्रम घेतले.
भिक्खू करुणानंद यांचे २० वर्षावास झाल्यामुळे त्यांना भिक्खू संघाच्या वतीने महाथेरो ही पदवी देण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्याहस्ते आणि भिक्कू संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र, कठीण चिवरदान देऊन कार्याचा गौरव केला. यावेळी उपस्थित भिक्खू संघालाही कठीण चिवरदान आणि इतर वस्तूंचे दान देण्यात आले.