

गंगापूर : शेतात पिके उभी, पाणी उपलब्ध; मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाण्याची भीती, अशी परिस्थिती निर्माण झालेल्या वरखेड परिसरातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वावर असलेला बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पकडल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वरखेड परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्याने सोनवणे यांच्या सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या बोकडाचा, तर सुशीलभाऊ लासुरे यांच्या वासराचा फडशा पाडला. अन्य शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ले झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते.
बिबट्याच्या वावरामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे धोकादायक झाले होते. त्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली होती. दिवसा शेतात जातानाही शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागत होती.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अखेर पिंजरा उपलब्ध करून त्यात बकरू ठेवण्यात आले. बाळूमामा लासरे यांनी बकरू उपलब्ध करून दिले. होते. यामुळे बिबट्याला पकडण्यास मदत झाली.
ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
पिंजरा उपलब्ध होण्यासाठी संदीप वैराळ, दिलीपभाऊ वाघ, रामहरी निश्चीत आणि अनिकेत लासरे यांनी प्रयत्न केले. आमदार रमेश बोरणारे यांचेही यासाठी सहकार्य लाभले. वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईसाठी सहकार्य करणारे ग्रामस्थ, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच बकरू देणारे बाळूमामा लासरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.