

कन्नड ः तालुक्यातील रेल येथील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून शिवरस्त्यासाठी संघर्ष करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही स्थानिक अधिकाऱ्या कडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत, अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते बापू गवळी यांच्या नेतृत्वाखाली थेट सत्याग्रह उपोषण सुरू केले आहे.
मक्रणपूर शिवारात शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतीची कामे करणे, पिकांची ने-आण करणे कठीण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली असता, रस्ता काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक स्तरावर या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहेत. प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे.
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात शेख दादा शेख रज्जाक, हिराबाई गुंजाळ आणि कैलास थेटे हे शेतकरी सहभागी झाले आहेत.
जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल
तालुक्यातील मक्ररणपूर शिवारात शिवरस्ततेच नाहीत. जे आहेत त्यावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यशासन शिवरस्ते मोकळे करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, याकडे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नाहक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यातचव शिवरस्ते मोकळे न झाल्यास शेतकरी यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.