

Excessive rainfall in only 5 revenue circles in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचा दुसरा महिनाही संपला आहे. शेवटचे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. परंतु अद्यापही विभागात मोठा पाऊस बरसलेला नाही. दोन महिन्यांत ३०९ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत केवळ २४३ मिमी चीच नोंद झाली. तर विभागातील केवळ ५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात गतवर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. असे असले तरी राज्यातील नगर, नाशिकसह कोकण आणि मुंबईमध्ये दमदार पाऊस बरसला. त्यामुळे मराठवाड्याचे लक्षही आता मोठ्या पावसाकडे लागले आहे. विभागात मान्सूनच्या दोन महिन्यांत केवळ हलक्या व मध्यम स्वरूपाच्याच पावसाची हजेरी लागली आहे.
मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. विभागात मंगळवारी (दि.२८) ८.३० वाजेपासून ते बुधवारी (दि.२९) सकाळी ८.३० वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासांत ९.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात यात नांदेडमध्ये सर्वाधिक २४.९ मिमी, तर त्यापाठोपाठ लातूर १४.८ मिमी, धाराशिवमध्ये ९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विभागातील तीन जिल्ह्यांतील ५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची झाली आहे. यात बीडच्या मोहखेड मंडळात ८५. ५० मिमी, अंजनडोह ८५.५० मिमी, लातूरच्या उदगीर मंडळात ६९.५० मिमी, घोणसीमध्ये ६६.२५ मिमी, नांदेडच्या मारखेल मंडळात ८४.५० मिमीची नोंद झाली.