

EVMs from Nanded to be used for the Zilla Parishad elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत नांदेड येथून मतदान यंत्र (ईव्हीएम) मागविण्यात येणार आहेत. तसेच या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर पे-नऐवजी जुन्या पद्धतीच्या शाईचा वापर केला जाणार आहे. दुसरीकडे निवडणुकीत शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवायांचा सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि झेडपी सीईओ अंकित तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदेसाठी गुरुवार, ५ फेब्रुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण आहेत.
निवडणुकीसाठी १ जुलै २०५ रोजी अंतिम झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. एकूण २२८२ मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात ५०२४ मतदान यंत्रे, २५१२ कंट्रोल युनिट लागणार आहेत. ही यंत्रे नांदेड हून मागविली जाणार आहेत. नांदेडहून ३०४८ कंट्रोल युनिट, ५५९२ मतदान यंत्रे येणार आहेत. मनपा निवडणुकीत काही जणांनी शाईऐवजी बोटावर मार्कर पेनने खूण केल्याने आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे या निवडणुकीत जुन्या पद्धतीच्या शाईचा वापर केला जाणार आहे, असेही स्वामी यांनी सांगितले.
१० हजारांहून अधिक मनुष्यबळाची आवश्यकता
२२८२ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील त्यासाठी १० हजार ०४८ अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून १२ हजार मनुष्यबळाची उपलब्धता आहे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. या मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करून घेणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे. विविध समित्यांचे गठन करणे अशा विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.