

E-Peak survey halted due to 'server down'
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : पीककर्ज, सरकारी योजनांचे अनुदान व पीकविम्यासाठी सातबाऱ्यावर पीक नोंद बंधनकारक आहे. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे ई-पीक पाहणी अॅपवरून पिकांची नोंदणी होत नाही. सतत प्रयत्न करूनही नोंदणी होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. सर्व्हर डाउनच्या नावाखाली तलाठ्यांकडून अडवणूक गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तर सर्व्हर डाउनमुळे तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली, याबाबत महसूल विभागही अनभिज्ञ आहे.
राज्यात खरीप हंगामाला जूनपासून सुरुवात होते. मात्र, राज्य सरकारने दोन महिने उशिरा एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पिके काढणीला आली आहेत. तर ई पीक पाहणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, अॅप तीन ऑगस्टपासून कार्यान्वित झाला आहे. सर्व्हर डाउनमुळे ई पीक पाहणी होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सतत सव्र्व्हर बरोबर संपर्क होत आहे... कृपया वाट पहा अन्यथा अॅप परत चालू करा हा संदेश पाहून शेतकरी वैतागले आहेत. परंतु दरवर्षी ई पीक पाहणी करताना या अडचणी येत असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत काही करताना दिसत नाहीत.
सर्व्हर डाउनमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. याविषयी सोमवारपासून माहिती संकलित करण्यात येणार आहे, असे तहसील कार्यलयातील अधिकारी सांगत आहे.
कर्ज, खरेदी-विक्रीसाठी शेतकऱ्यांना शेतजमिनीचे मूल्यांकन करावे लागते. त्यासाठी तीन वर्षांचा पीक पेरा नोंद आवश्यक आहे. ई पीक पाहणी न झाल्यास अशावेळी तलाठी अडवणूक करून गैरप्रकार करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ई पीक पाहणी सुरू झाल्यापासून दरवर्षी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही महसूल प्रशासन याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते. या गैरप्रकारांना वाव मिळावा, अशीच भूमिका महसूल विभागाची नाही ना, अशी शंका येते.
ई पीक पाहणी केल्यावर ४८ तासांत सातबारा उताऱ्यावर पीक नोंदणी होणे आवश्यक आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केल्यावर आठवडाभरानंतरही सातबाऱ्यावर पिकांची नोंद न झाल्याच्या तक्रारी आहेत. यावरून संबंधित यंत्रणेकडून वेळेत अॅप्प्रुव्ह केले जात नसल्याचे दिसते. तर अॅप्नुव्हल बंद असल्याचे तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर अॅपवर दिलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या क्रमांकावर संपर्क होत नाही.