

Due to the shortage of LPG, the wheels of many rickshaws have come to a halt.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
: गेल्या अनेक दिवसांपासून शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा सुरू आहे. यामुळे अनेक गॅसवर चालणाऱ्या रिक्षांची चाके थांबली आहेत, तर काही जण नाविलाजास्तव त्या रिक्षा पुन्हा पेट्रोलवर चालवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
१६ एलपीजी पंपांपैकी शहरातील केवळ दोनच पंपावर गॅस उपलब्ध आहे. इतर पंपांवर मात्र गॅसचा ठणठणाट सुरू आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे चक्क अर्ध्या दिवसापेक्षा जास्त वेळ रांगेत जात असल्याने अनेकांनी पेट्रोल पर्याय निवडला, परंतु त्यात उत्पन्न तोकडे येत असल्याने काही रिक्षाचालकांनी रिक्षा थांबवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजघडीला एक हजारापेक्षाही जास्त रिक्षांची चाके थांबलेली आहेत. याचा परिणाम प्रवासी वाहतुकींवरही होत आहे.
प्रवाशांच्या अडचणीत भर
प्रवाशांच्या सेवेसाठी शहरात सुमारे १५ हजारांपेक्षाही जास्त रिक्षा रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षाचालकांनी रस्त्यावर न उतरण्याचा निर्णय घेतल्याने सुमारे एक हजार रिक्षा सेवा देत नाहीत. याचा भार उपलब्ध रिक्षांवर पडत असल्याने प्रवाशांना रिक्षा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोल सुरळीत : गॅस गायब
मागील दोन दिवसांत अफवेमुळे पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून शहरात गॅसचा ठणठणाट असल्याने अनेकांनी गॅसऐवजी पेट्रोलचा प्रयोग केला, परंतु त्यातून येणाऱ्या उत्पन्नातील थोडीफारच रक्कम हाती राहत आहे. दुसरीकडे शहरात केवळ दोनच पंपांवर गॅस उपलब्ध असल्याने तेथे रिक्षांच्या रांगाच रांगा आहेत. अर्धा दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ रांगेतच जात असल्याने त्या दिवशीच्या व्यवसायावर परिणाम होत आहेत. याला कंटाळून अनेकांनी रिक्षा थांबवणेच उचित समजले. त्यामुळे अनेक रिक्षांची चाके थांबली आहेत.