पाचोड: 'तोरणाखाली जमला मेळा सजून धजून आले सर्जा-राजा…' दिवसेंदिवस शेती क्षेत्रात होणारी घट, सततचे दुष्काळी चटके, शेतातमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्याने झालेला शिरकाव आणि बैलांच्या गगनाला भिडलेल्या किमती तसेच बैलांचा खाण्यापिण्याचा आवाक्याबाहेर जात असलेला अमाप खर्च शेतकऱ्यांना आता डोईजड ठरु लागला आहेत. शिवाय शेती बिन भरोशाची होत चालल्याने तसेच आर्थिक डाबघाईला जात असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकरण बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकरी सतत कर्जाच्या बोज्याखाली सापडत आहे. अशा परिस्थितीत बैल जोडीचा खर्च आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे सर्जा राजाचे वैभव कमी होऊ लागले आहेत. बैलपोळ्या दिवशी भरग्गच भरणारे मैदाने आता रिकामे दिसत आहे. कृषीप्रधान देशासाठी हा विषय चिंतेची ठरु शकतो.
भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. पूर्वी शेती ही भूषाण वाटणारे तसेच गावात रुबाब दाखवणारे व्यवसाय होते. पूर्वी ज्यांकडे जास्त शेती आणि जनावरे असले की, त्याला आपोआप गावात मोठेपणाचे वलय प्राप्त व्हायचे. शिवाय जास्तीच्या शेतीची चर्चा गावोगावी व्हाययची. एक प्रकारे तो गावाचा जमिनदार म्हणून सर्वपरिचीत असायचा. पूर्वी शेतकऱ्यांना शेतीच हाच व्यवसाय साधा सरळ आणि पदरात दोन पैसे पडणारे म्हणून भरोशाचा वाटत होता.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दाराशी दुभती जनावरे आणि गोठ्यात बैलजोडी हमखास दावणीला दिसायची. जमिनीच्या मशागतीपासून तर मालाच्या कामासाठी बैलजोडी उपयोगी पडते. त्यामुळे बैलांच्या कष्टावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण चालते. पूर्वी बैल हे शेतकऱ्यांच्या गोठ्याचे वैभव होते. बैलांच्या किमती आवाक्यात होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांकडे तीन-चार बैलजोड्या सहज असायच्या. त्यामुळे गोठ्याला वैभव यायचे. परंतु, काळाच्या ओघात बळिराजाच्या गोठ्याचे वैभव हळूहळू लोप पावत चालले आहे.
शेतात आधुनिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढल्याने शेतातील बैलांचा वापरही कमी झाला आहे. तसेच बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एका बैलजोडीची किमत पन्नास हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना बैल पाळणे अशक्य झाले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जनावरे दिसत असली तरी ती फक्त दूध व्यवसायासाठी असतात. गोठ्यात बैल जोडी ऐवजी गायी, म्हशी दिसून येतात. पूर्वी गोठ्यातील बैलांच्या संख्येतून त्यांची समृद्धी मोजली जात होती. मात्र, बदलत्या आधुनिक युगात ट्रँक्टर, मळणी यंत्र, जेसीबी, हार्वेस्टर, पाणीपंपा आदी यांत्रिकीकरणाचा उदय होऊन त्याचा शेतीत झपाट्याने शिरकाव होऊन उपयोगात आणण्यात आल्याने बैलांची संख्या झपाटयाने कमी होत चालली.
लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतीच्याही वाटण्या होत गेल्या. पूर्वी ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन असायची आज त्यांच्याकडे तुटपुंजी जमीन आहे. बहुतांशी शेतकऱ्याकडे बैलजोडी ठेवण्याइतपत पण जमीन राहिलेली नसून पर्यायाने त्यांचा कल मोठ्या शेतकऱ्यांच्या मदतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्याकडे वाढला आहे.
सालगड्यांच्या मजुरीतही मोठी वाढ झाल्याने मोठे शेतकरी यंत्राचा वापर शेतीत अधिक करीत आहेत. काही वर्षापूर्वी पडीक जमिनीचे क्षेत्र आणि पाऊस बऱ्यापैकी असल्याने चाऱ्याचा प्रश्न नव्हता. शेतकरीही बांध धुरे ठेवायचे. परंतु, शेतीचे क्षेत्र घटत गेल्याने प्रत्येकाच्या वाट्याला कमी जमीन येत असल्याने आता पडीक जमीन ठेवणे परवडत नाही. पर्यायाने वैरनाची समस्या गंभीर झाली. शेवटी बैलासह इतर जनावरे कमी होत गेले.
पूर्वी पोळ्याची तयारी महिनाभरापासून चालायची. बैलांची सजावट, सूत कातने, मोरक्या, गोंडे, घागरमाळी, झुली आदी साहित्य घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असायचा. आजही रेडिमेड सजावट साहित्याची खरेदी होते. परंतु, त्यात ती पहिली मजा नाही. हातात घेऱ्या घेऊन सुताला पीळ देणारे शेतकरी गोंडे करतात. बैठकीत रंगत जाणाऱ्या गप्पा यातील आनंद पहिल्याप्रमाणे दिसत नाही.
हेही वाचा :