हतनूर, पुढारी वृत्तसेवा: बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षीत शिक्षण घेणाऱ्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना हतनूर येथे आज (दि.१९) पहाटे उघडकीस आली. पार्थ राजेभाऊ तौर (वय २२, रा. चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ हा हतनूर येथील जनार्दन वामन काळे यांच्या घरात भाड्याने राहत होता. आज पहाटे ४ च्या दरम्यान घरातील गॅलरीवरुन उडी मारून दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह भाऊसाहेब शिंदे यांना दिसून आला. पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी या घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याला दिली. हतनूर येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप कांबळे यांनी पार्थला तपासून मृत घोषित केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, कैलास करवंदे, संजय आटोळे, शिवदास बोराडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास कैलास करवंदे करीत आहेत.
हेही वाचा