

Complete the work Sukhna river project work before the rains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील खाम आणि सुखना या दोन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. आगामी मान्सूनमध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रातील स्वच्छता, अडथळे दूर करणे, रुंदीकरण आणि काठांच्या मजबुतीकरणावर प्रशासनाने आता लक्ष केंद्रित केले आहे.
खाम नदीपात्राचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू असून, सुखना नदीच्या पुनरुज्जीवनालाही वर्षभरापूर्वी प्रारंभ झाला आहे. या कामांचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, नदी स्वच्छतेशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित ठेवले जाऊ नये. सुखना नदी प्रकल्पासाठी विशेष अधिकारी जयंत कुलकर्णी यांना कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखून केवळ स्वच्छ प्रवाह राहावा, यादृष्टीने तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
प्रशासकीय यंत्रणा कामाला; जबाबदाऱ्या निश्चित नदी पुनरुज्जीवनाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी विविध विभागांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेतः तांत्रिक देखरेख : रुंदीकरण, खोलीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामावर शहर अभियंता संजय कोंबडे लक्ष ठेवून आहेत.
नदीकाठ सुशोभीकरण मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांचे पथक सुशोभीकरण व कचरा निर्मूलनासाठी स्वतंत्र मोहीम राबवत आहे. केंद्रीकरण: कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी मजबुतीकरणाच्या कामाची पाहणी करत आहेत.
नदीपात्रातील अडथळे दूर करण्यावर भर
जून महिन्यापर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावयाच्या कामांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्पाचे विशेष अधिकारी असदउल्ला खान यांना दिले आहेत. विशेषतः पावसाळ्यात सुखना नदीच्या प्रवाहामुळे नारेगाव व परिसरातील नदीकाठच्या वसाहतींमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याचा प्रवाह मोकळा ठेवण्यावर प्रशासनाचा सर्वाधिक भर आहे. वेळेत आणि प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे लक्ष्य आयुक्तांनी ठेवले आहे.