

Cold response to RTE admission process
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू असली तरी यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील खासगी शाळांमधील एकूण ४ हजार ९११ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून आतापर्यंत केवळ ३ हजार ३७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.
आरटीई अंतर्गत पालकांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. यंदाही ऑनलाइन सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र कागदपत्र पडताळणी, वेळेत प्रवेश न घेणे, काही पालकांचा प्रतिसाद नसणे आदी कारणांमुळे अनेक जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत.
शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या पालकांना वारंवार संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रिक्त राहिलेल्या जागांसाठी पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक पालकांना ऑनलाइन प्रक्रियेची अपुरी माहिती, आवश्यक कागदपत्रांची अडचण तसेच शाळांच्या अंतराचा प्रश्न भेडसावत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.