

छत्रपती संभाजीनगर : राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरावर बंदी आहे. परंतु शहरात व्यावसायिकांकडून सर्रासपणे वापर सुरू आहे. ही गंभीरबाब असून, मुख्य विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबवा आणि दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करा, असे आदेश महापौर समीर राजुरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातच नव्हे तर देशभरात सिंगल युज प्लास्टिक कॅरीबॅग वापरावर बंदी आहे. जगभरात प्लास्टिकविरोधात जनजागृती सुरू आहे. त्याच्या वापरामुळे निसर्गाचे संमतोल बिघडत आहे. मात्र, अजूनही प्लास्टिकच्या विरोधातील कारवाईत सातत्य नाही.
शहरात कॅरीबॅग तयार करणारे कारखाने नाहीत. परंतु, शहराबाहेरू मोठ्याप्रमाणात आवक होत असल्याने ती रोखण्यावर महापालिका लक्ष केंद्रित करणार आहे. शहरातील प्रमुख कॅरीबॅग विक्रेत्यावर कारवाई करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. त्यानुसार आता प्रशासनाकडून अंमलबजावणीची तयारी करण्यात येत आहे.
येत्या आठवडाभरात महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाणार आहे. दोन्ही विभागाकडून संयुक्तरीत्या ही मोहीम राबवून कारवाई केली जाणार आहे.
शहरातील विविध कचरा कुंडी परिसरात कचर्यापेक्षा कॅरीबॅगचीच संख्या अधिक असल्याचे दिसते. काही ठिकाणी या कॅरीबॅग कचरा-वेचक उचलून नेतात, परंतु बहुतांश ठिकाणी या प्लास्टिक बॅग कचरा डेपोपर्यंत जातात.
प्लास्टिंग बॅग या नष्ट होत नाहीत. त्यामुळे अजूनहीच धोकादायक असून, नागरिकांनी स्वतःच याबाबत जागृत होणे आवश्यक असल्याचेही महापौर राजुरकर म्हणाले.
काही वसाहतींमध्ये प्लास्टिक बॅग बंद
शहरातील काही वसाहतीतील रहिवाशांनी स्वतःहून प्लास्टिक कॅरीबॅग वापरावर बंदी घातली आहे. या वसाहतीतील नागरिकांनी कापडी बॅगचा वापर सुरू केला आहे. घरातून मार्केटमध्ये जातानाच ते कापडी बॅग घेऊन जातात, असेही महापौरांनी सांगितले.