

धाराशिव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील (भाजप) तर उपाध्यक्षपदी उषा रवींद्र गायकवाड (शिवसेना) यांची बहुमताने निवड झाली. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर जल्लोष साजरा केला. यावरून शिवसेना व भाजपचे मनोमिलन झाल्याचे यावरून स्पष्ट झाले.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 13) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा घेण्यात आली होती. या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काम पाहिले, तर सहायक म्हणून उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे उपस्थित होत्या.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्चना पाटील यांना 45 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कांचनमाला संगवे यांना 9 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उषा गायकवाड यांना 45 मते मिळाली, तर काँग््रेासचे महेश देशमुख यांना 10 मते मिळाली. त्यामुळे अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी तर उषा गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
जिल्हा परिषदेत एकूण 55 सदस्य असून त्यात भाजपचे 19, शिवसेनेचे 15, शिवसेना (ठाकरे) सात, राष्ट्रवादी काँग््रेास सहा, काँग््रेास तीन, समाजवादी पक्ष एक आणि चार अपक्ष सदस्य आहेत. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
या कालावधीत महायुतीकडून अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी उषा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. तर शिवसेना (ठाकरे) आणि काँग््रेास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कांचनमाला संगवे व उपाध्यक्षपदासाठी महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. त्याआधी महायुतीचे सदस्य खासगी आराम बसने जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्याचवेळी विरोधी पक्षाचे उमेदवारही उपस्थित झाले. निकला जाहीर झाल्यापासून महायुतीचे सर्व सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अज्ञातस्थळी होते. ते शहरात आज दाखल झाले.
दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला; मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे मतदान घेण्यात आले.
प्रा. गायकवाड ताकदवर
माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वीच उमरगा नगराध्यक्षपदी त्यांची चिरंजीव विजयी झाले आहेत. यामुळे माजी खा. प्रा. गायकवाड यांची जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.