छत्रपती संभाजीनगर : नांदेडच्या रुग्णकांडाने हाहाकार उडवला असतानाच छत्रपती संभाजीनगरातील घाटी या सरकारी रुग्णालयातही 14 रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली. अधिष्ठाता संजय राठोड यांनी अगदी शेवटच्या क्षणी रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा आणि वेळेआधी प्रसूती झाल्याने दोन नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मरण पावलेल्या या रुग्णांमध्ये किडनी, यकृत, हृदयविकार, अपघात, वृद्धांसह नवजात शिशूंचा समावेश आहे. याशिवाय जळीत प्रकरणातीलही रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या ठिकाणी दररोज दोन हजारांवर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. बाहेरच्या रुग्णालयांतूनदेखील या रुग्णालयात रुग्णांना रेफर केले जाते. रेफर झालेले रुग्ण अगदी शेवटच्या क्षणी पाठविले जातात, असेही घाटी प्रशासनाने सांगितले.