

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेचे शाखा अभियंता संजय चामले यांना रेखांकनप्रकरणात २९ एप्रिल २०२२ साली ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात अटक झाल्यानंतर महापालिकेने त्यांना निलंबितही केले होते. मात्र गेल्याच वर्षी त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेत नगररचना विभागाचे कामकाजही दिले.
एवढेच नव्हे तर वस्तुस्थिती पाहता लाच मागितल्याचे सिद्ध होत नाही, असे कारणपुढे करून न्यायालयात अभियोग दाखल करण्याच्या परवानगीला आयुक्त जी. श्रीकांत यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला नकार दिला. त्यासोबतच चामलेंना क्लीन चिट देत न्यायालयाआधीच न्यायनिवाडा केल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता संजय चामले यांच्याकडे ले आऊट मंजुरीसाठी एकाने मागणी केली होती. या मागणीनुसार लेआऊटच्या मंजुरीसाठी चामले यांनी संबंधिताकडे ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यातील ३ लाख रुपये देण्याचे ठरले. ही लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ चामले यांना पकडले. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.
या अटकेच्या कारवाईनंतर महापालिकेने त्यांना निलंबितही केले होते. या घटनेनंतर सातारा परिसरातील नागरिकांनी आतषबाजी करून जल्लोष साजरा केला होता. या घटनेनंतर महापालिकेने गेल्याच वर्षी निलंबन हटवत चामले यांना सेवेत रुजू करून घेतले होते.
दरम्यान, नुकतीच चामलेंची नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे. या बदलीपूर्वी चामले यांच्याविरोधात अभियोग दाखल करण्यासाठी लाच लुचपत विभागाच्या अप्पर महासंचालकांनी महापालिकेला पत्र पाठविले होते. त्यात अभियोग दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.
या पत्राचे उत्तर देत आयुक्त जी. श्रीकांत यांनी २७ जून २०२५ रोजी अप्पर महासंचालकांना पत्र पाठवून अभियोग दाखल करण्यास परवानगी नाकारली. एवढेच नव्हे तर ज्या लेआऊटसाठी लाचेची मागणी केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे,
त्या लेआऊटसाठी महापालिकेच्या नगररचना विभागात २९ एप्रिल २०२२ पूर्वी प्रस्तावच दाखल झालेला नाही. त्यामुळे लाचेची मागणी सिद्ध होत नाही, असे अप्पर महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद करून आयुक्तांनी चामलेंना क्लीन चिट दिली आहे.
मग ट्रॅपपूर्वीच्या रेकॉर्डिंगचे काय?
लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे लाचखोरीबाबत आलेल्या प्रत्येक तक्रारींची शहानिशा होते, तक्रार येताच लागलीच ट्रॅप लावला जात नसतो. त्या तक्रारीची शहानिशा करताना लाचेची मागणी केल्याचे जेव्हा रेकॉर्डिंगमध्ये सिद्ध होते, तेव्हाच ट्रॅप (सापळा) लावला जातो अन् त्यानंतर लाच स्वीकारल्यानंतरच रंगेहाथ पकडण्यात येते.
मनपाचे शाखा अभियंता संजय चामलेंविरोधातही असाच ट्रॅप झाला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तेव्हा लाच त्याच रेखांकनाच्या प्रस्तावासाठी मागितल्याचे सिद्ध होत असताना अभियोग का नाकारला, असा सवाल उपस्थित होत आहे