

Chhatrapati Sambhajinagar Mahavitaran teams in Jalna for recovery
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात महावितरण थकीत विज बील वसुलीसाठी आक्रमक झाली असली तरी वीज बिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. दिवसांतून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. दुसरीकडे थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणच्या पथकानी सलग दुसऱ्या आठवड्यात अठराशे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून एकाच दिवसात दीड कोटींची वीज बिल वसुली केली आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या परिमंडल कार्यालयाने पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरहून अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवून राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागांतील अठराशेहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या पथकांना ७३ अधिक लोक वीजचोरी करताना आढळून आले. छत्रपती संभाजीनगरच्या पथकांनी जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात केलेल्या धडक कारवाईमुळे वीजबिल थकबाकीदार व वीजच ोरांत खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १ लाख २७ हजार ५३२ ग्राहकांकडे वीजबिलांची १२५ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यासाठी जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील शाखा अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवण्यास येत आहे. सोमवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अभियंता व तंत्रज्ञांची तब्बल ८७ पथके दाखल झाली. यावेळी जुना जालना, मस्तगड, शनिमंदिर, अंबड चौफुली, भाग्यनगर, सराफा बाजार, बडी सडक, सदर बाजार, मंठा चौफुली, कन्हैय्यानगर, चंदनझिरा, दुःखीनगर, शंकरनगरसह अंबड, शहागड, महाकाळा, गोंदी, घनसावंगी, मंठा व परतूर येथे वीज बिल वसुली करण्यात आली.
जालना शहरासह जिल्ह्यात वीजपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू आहे. दिवसातून अनेकदा वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने ग्राहक वैतागलेले असतानाच ऐन सणामधे महावितरणने वसुलीचा शॉक देणे सुरू केले आहे. वसुली मागताना महावितरणने सेवाही सुधारणे गरजेचे आहे.