

Kannad Taluka Woman Dies Of Snake Bite
हतनूर : कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतात मिरचीची लागवड करत असताना विषारी सापाच्या दंशामुळे एका विवाहित शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी घडली.
रोहिणी सतीश नागोडे (वय २३, रा. शिवराई, ता. कन्नड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजता शेतात मिरचीची लागवड करत होत्या. यावेळी मल्चिंग पेपरखाली दडून बसलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर त्या बेशुद्ध पडल्या.
घटनेनंतर त्यांना तातडीने कन्नड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
रोहिणी नागोडे यांच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा, अकरा महिन्यांचे बाळ तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता शिवराई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत दुर्दैवीरीत्या झालेल्या या घटनेमुळे दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून संपूर्ण शिवराई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.