सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा पूर्णा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील बोरगाव सारवणी येथे उघडकीस आली. नणंद-भावजयी सोमवारी (दि. २) सकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू असताना मंगळवारी सकाळी पाण्यात दोघींचा मृतदेह तरंगत असताना ग्रामस्थांना दिसला. फरिदाबी शेख नासेर (३५), यास्मिन शगीर शेख (२८, दोघे रा. बोरगाव सारवणी) असे नणंद- भावजयींची नावे आहेत.
या नणंद-भावजयी सोमवारी सकाळी शेतात गवत आणण्यासाठी गेल्या. दुपार झाली तरी परत आल्या नाही म्हणून घरच्या मंडळींनी शोध घेणे सुरु केले. बराच शोध घेऊन त्या सापडल्या नाहीत त्यामुळे घरच्या मंडळींनी सायंकाळी सिल्लोड ग्रामीण पोलिस गाठले व बेपत्ता असल्याची तक्रारही दिली. मंगळवारी पहाटेच्या २ वाजपर्यंत नातेवाईक, ग्रामस्थांनी परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला मात्र दोघी काही सापडल्या नव्हत्या त्यामुळे नातेवाईक काळजीत होते. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास गावाशेजारील पूर्णा नदीत मृतदेह तरंगत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. तातडीने धाव घेत पाहणी केली असता बेपत्ता नणंद- भावजयी असल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह धाव घेत मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी रुग्णालयात मृतांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून मृत महिलांचा दुपारी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. फरीदाबी यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले तर बुडून त्यांचा मृत्यू झाला. यास्मिन यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आहे. त्यांचे अकाली निधन झाल्याने मुले पोरकी झाली असून आईचे छत्र हरवले आहे.
चारनेर- पेंडगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पूर्णा नदीला पाणी आलेले आहे. या पाण्यातून सहज जाता येते. मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी मोठाले खड्डे करुन ठेवलेले असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. या महिलाही नदीतून जात असताना अशाच खड्यात गेल्या व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसापूर्वी खोड़काई वाडी जवळ पूर्णा नदीत शहरातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
या महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदन सुरू असताना या दरम्यान गावात दोघांचे निधन झाले. लतीफ पटेल (७५) यांचे वृध्दपकाळाने तर हालेदाबी शब्बीर (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. एकाच दिवशी चौघांवर दफनविधी करण्याची दुर्दैवी वेळ ग्रामस्थांवर आली